काहीही वाटण्याच्या कितीही त-हा असू शकतात.
मुंब्र्याचा डोंगर बोगद्यात अदृश होतो, झोपडपट्टीतून एखादाच नारिंगी पतंग छतांवर भिरभिरताना दिसतो, धुराचा खाडीचा वास श्वासात मिसळून आपलं ठळक अस्तित्व जाणवून देतो,
ट्रेनला रुळांचं भान सुटलंय् आणि ती कधीही आपल्याला हवी तशी धावेल असं वाटत राहतं.
आपण कुठे चाललोय त्याचा विचार करणं अनावश्यक वाटू लागतं एकाएकी.
ट्रेन सोबत सरकणारं शरीर आपलं नसावच इतकं हलकं होतं आणि त्याचवेळी बधीर जड.
कसला विचार करावा ?
रस्त्यांचा ?
कानात वाजणा-या कबीराचा ?
मेंदूत धावणा-या अतिसुक्ष्म वेदनेचा ?
कानशीलावर ओघळलेल्या एखाद्याच थेंबाचा ?
घरांचं अस्तित्व दाखवणा-या ठिपक्या ठिपक्या एवढ्या दिव्यांचा ?
तुझा ?
माझा ?
त्यांचा ?
सगळ्या जगाचा ?
मांजराचा ?
रस्त्याच्या कडेला दिसलेल्या एकट्या गाढवाचा ?
त्याला कळलं असेल का एकटेपण ?
जाणवलं असेल का ?
नाही कळलं एकटेपण मग काय होतं ?
कुणी आहे का या समस्त भूतलावर एकटेपण कळल्यावर तगलेलं ?
सर्वार्थाने तगलेलं ?
टिकलेलं ?
आहे का कुणी ?
असेल का कुणी ?
स्टेशन येतं.
गर्दी सोबत मी वाहत जाते.
ओळखीच्या प्लैटफौर्म वर अनोळखी प्रवास सुरु होतो एका नव्या रात्रींच्या दिशेने ............









